Pahalgam Terror Attack नंतर पाकिस्तानचा जोरदार प्रतिकार; द्विपक्षीय करार रद्द करण्याची शक्यता
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून घेतलेल्या कठोर निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व द्विपक्षीय करार रद्द करण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये 1972 मधील शिमला कराराचाही समावेश आहे. हे निर्णय गुरुवारी इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीचे नेतृत्व पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केले.
याआधी भारताने सिंधू पाणी वाटप करारासह एकूण पाच कठोर निर्णय जाहीर केले होते. पाकिस्तानने स्पष्टपणे म्हटले आहे की भारताने जर सिंधू जल करार एकतर्फी थांबवला, तर तो युद्धजन्य कृती समजली जाईल. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर आणि सुरक्षेवर कोणतीही गदा आल्यास त्यास तीव्र आणि व्यापक उत्तर दिले जाईल, असा इशारा पाकिस्तानने दिला आहे. त्यांनी भारतातील दहशतवादाविरोधात स्पष्ट भूमिका घेत असल्याचेही नमूद केले आहे.
सिंधू करारावर पाकिस्तानची ठाम भूमिका
भारताकडून सिंधू जल करार रद्द करण्याची घोषणा पाकिस्तानने संपूर्णपणे फेटाळली आहे. पाकिस्तानने स्पष्ट केले की हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीनंतर झालेला आंतरराष्ट्रीय कायदेशीर करार आहे आणि त्यास एकतर्फी रद्द करण्याचा अधिकार कोणालाही नाही. सिंधू जल प्रणाली पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाची असून, 240 दशलक्ष लोकसंख्येच्या जलपुरवठ्यासाठी ती जीवनवाहिनी आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाच्या पातळीवर मानला जाईल, आणि त्याला संपूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर दिलं जाईल.
पाकिस्तानचे त्वरित निर्णय
-
शिमला करारासह सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा विचार – भारताच्या “बेजबाबदार” वर्तनावर निषेध म्हणून.
-
वाघा बॉर्डर बंद – 30 एप्रिल 2025 पर्यंत क्रॉस-बॉर्डर हालचाली बंद राहणार.
-
SVES व्हिसा रद्द – शीख यात्रेकरू वगळता सर्व भारतीय नागरिकांना व्हिसा रद्द करण्यात आले.
-
48 तासात भारतात परतण्याचा आदेश – पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना परत जाण्याचे निर्देश.
-
भारतीय सल्लागारांना ‘Persona Non Grata’ घोषित – संरक्षण, नौदल, हवाई दल सल्लागारांना पाकिस्तानमधून बाहेर पडण्याचे आदेश.
-
भारतीय उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित – 30 एप्रिल 2025 पासून केवळ 30 कर्मचारी परवानगी.
-
हवाई क्षेत्र बंद – भारतीय विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचे आकाश बंद करण्यात आले.
-
व्यापार पूर्णतः स्थगित – थेट वा तृतीय देशांमार्गे होणारा सर्व व्यापार थांबवण्यात आला आहे.