काश्मीरमध्ये मोठे सर्च ऑपरेशन
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी व्यापक शोधमोहीम राबवली आहे. दहशतवाद्यांचे निवासस्थाने उद्ध्वस्त करण्यात आले असून त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच, दहशतवादी कारवायांना मदत करणाऱ्या सुमारे ४०० हून अधिक व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या वीस वर्षांत काश्मीरमध्ये राबवण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
पाकिस्तानी नागरिकांसाठी आज शेवटचा दिवस
भारत सरकारच्या निर्णयानंतर आज पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा अंतिम दिवस आहे. अटारी सीमेवर मायदेशी परतणाऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. भारत सरकारने दिलेले सर्व प्रकारचे व्हिसा आजपासून रद्द करण्यात आले आहेत. वैद्यकीय व्हिसासुद्धा केवळ २९ एप्रिलपर्यंत वैध राहणार आहेत. व्यापार, चित्रपट, पत्रकारिता, स्थलांतर, परिषदा, पर्वतारोहण, शिक्षण, पर्यटन व तीर्थयात्रेच्या उद्देशाने आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी तातडीने भारत सोडण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. यापुढे कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला नवीन व्हिसा दिला जाणार नाही.
भारताने झेलम नदीत पाणी सोडले; पाकिस्तानात पूरस्थिती
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करारातून माघार घेतली आहे. त्यानंतर भारताने मुझफ्फराबादमधील झेलम नदीमध्ये अतिरिक्त पाणी सोडले आहे. परिणामी, पाकिस्तानातील मुझफ्फराबाद शहरात भीषण पूर आला असून प्रशासनाने आणीबाणीची घोषणा केली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इराण आणि युएईचा भारताला पाठिंबा
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या भूमिकेवर जगभरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि भारताला जगभरातून समर्थन मिळत आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीनने भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तसेच, मुस्लीम देशांपैकी इराण आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) यांनीही उघडपणे भारताच्या बाजूने भूमिका घेतली आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधत पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.