एका मेंढपाळ कुटुंबातील बिरदेवने कठीण आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतून संघर्ष करत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशात 551 वा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे निकालाच्या दिवशी तो आपल्या मेंढ्यांच्या कळपासह कर्नाटकातील बेळगावजवळील अथणी येथे गेला होता. तिथेच पालावर धनगरी फेटा बांधून गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला.
शालेय जीवनापासूनच अधिकारी होण्याची जिद्द
बिरदेवने यमगे येथील प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. दहावीला त्याने 96% गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिल्या क्रमांकाने यश मिळवलं. पुढे शिवराज विद्यालय, मुरगूड येथून बारावी पूर्ण करताना त्याने 89% गुण मिळवले. त्यानंतर पुण्यातील COEP कॉलेजमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं.
स्वप्नं मोठं, पण आर्थिक संकट तितकंच मोठं
यूपीएससीची तयारी करण्यासाठी आवश्यक असलेली मोठी रक्कम, त्याचबरोबर राहण्याची आणि शिकण्याची सोय नसतानाही बिरदेवने हार मानली नाही. वडिलांनी ‘नोकरी शोध’ असा सल्ला दिला, पण त्याच्या स्वप्नाला धक्का न बसू देता, भारतीय सैन्यात कार्यरत असलेला त्याचा भाऊ वासुदेव याने त्याचा आर्थिक भार उचलला. दोन वर्षं दिल्लीमध्ये आणि त्यानंतर पुण्यात तयारी करून त्याने अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं.
निकालाच्या दिवशीही मेंढपाळीची जबाबदारी पार पाडली
यूपीएससी निकालाच्या दिवशी बिरदेव आपल्या पालकांसह मेंढ्यांचा कळप घेऊन कर्नाटकात गेला होता. निकालाची बातमी मिळाल्यावर, जिथे तो थांबला होता तिथेच पारंपरिक धनगरी फेटा घालून त्याचा गौरव करण्यात आला. त्याच्या या यशाने केवळ यमगे नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान वाटत आहे.
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
बिरदेव डोणेंचा प्रवास हा प्रचंड जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं प्रतीक आहे. अपार अडचणींचा सामना करत, त्याने दाखवून दिलं की, मेहनतीच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.