जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असून, युद्धजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ७ मे रोजी युद्धसराव (मॉक ड्रील) राबवण्याचे आदेश दिले आहेत.
या सरावाचा उद्देश नागरी भागात हवाई हल्ला झाल्यास नागरिकांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याचे प्रशिक्षण देणे हा आहे. सायरन वाजवून हवाई हल्ल्याचा इशारा दिला जाईल. त्यानंतर लाईट बंद करणे, सुरक्षित स्थळी हलणे, ब्लॅकआऊट प्रक्रिया आणि आपत्कालीन स्थितीत प्रतिक्रिया यावर प्रशिक्षण दिले जाईल.
राज्य सरकार सज्ज – यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश
या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व यंत्रणांना हायअलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाकडून मंत्र्यांना संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कोणकोणत्या शहरांमध्ये मॉक ड्रील व ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे.
मॉक ड्रील होणारी ठिकाणं – महाराष्ट्रातील १६ क्षेत्रं
१. मुंबई
२. उरण (जेएनपीटी)
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग
इतिहासाची पुनरावृत्ती – 1971 मध्येही सराव झाला होता
१९७१ साली पाकिस्तानसोबत तणाव वाढल्यानंतर देखील राज्यभर मॉक ड्रील घेण्यात आली होती. तेव्हा सायरन वाजल्यावर नागरिक लाईट बंद करत आणि जमिनीवर उतरत. ताजमहालसारखी ऐतिहासिक वास्तू काळ्या कापडाने झाकण्यात आली होती. त्या वेळचे फोटो आणि वृत्तपत्रांतून जनजागृतीचे दाखले आजही उपलब्ध आहेत.
नागरिकांनी लक्षात ठेवाव्यात या गोष्टी
सायरन वाजताच घरातील सर्व लाइट्स त्वरित बंद कराव्यात. प्रकाशामुळे शत्रूचे विमान लक्ष्य निश्चित करू शकते. नागरिकांनी तळमजल्यावर किंवा सुरक्षित स्थळी जावे. मोबाइल, टीव्ही सारखी उपकरणे बंद करावीत. आपत्कालीन स्थितीत जखमी व्यक्तींवर त्वरित प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयात कसे न्यायचे याचाही सराव केला जाणार आहे.
ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांच्या मते, अशा सरावामुळे खऱ्या प्रसंगी भीती न वाटता नागरिक योग्य कृती करू शकतील.