Home » पाकिस्तानची भारताच्या सीमारेषेवर कुरापत – MEA कडून खुलासा, संयम ठेवत भारताची ठाम भूमिका

पाकिस्तानची भारताच्या सीमारेषेवर कुरापत – MEA कडून खुलासा, संयम ठेवत भारताची ठाम भूमिका

MEA च्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करताना नागरी हवाई मार्गाचा गैरवापर केला आहे. यामध्ये लाहोरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांमागे लपून हल्ले करण्यात आले.

भारताच्या सीमारेषेवर सध्या पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली सुरू असून, लढाऊ विमानांच्या गुप्त हालचालींसाठी विविध युक्त्या वापरण्यात येत आहेत. मात्र, भारत संयम राखून सर्व कारवायांना चोख प्रत्युत्तर देत आहे.

कर्नल कुरेशी यांनी स्पष्ट केलं की, नियंत्रण रेषेवर 26 ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न झाला. उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर आणि भटिंडा येथील लष्करी तळांवर थोड्याफार प्रमाणात नुकसान झालं असलं, तरी बहुतांश हल्ले निष्फळ ठरले आहेत.

पाकिस्तानने केवळ लष्करी तळांनाच नव्हे, तर एका शाळेलाही लक्ष्य केलं. मात्र, भारताने अत्यंत मोजक्या आणि अचूक प्रतिकारात्मक हल्ल्यांतून पाकच्या विविध रडार, कमांड सेंटर्स आणि हवाई तळांवर परिणामकारक कारवाई केली.

MEA सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी संयुक्तपणे दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आलं की, पाकिस्तानकडून फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचाराचा मारा सुरु आहे, पण भारत हे सर्व पुराव्यांसह फेटाळून लावत आहे.