Home » शेअर बाजारात जोरदार उसळी: जाणून घ्या या वाढीचं कारण काय आहे?

शेअर बाजारात जोरदार उसळी: जाणून घ्या या वाढीचं कारण काय आहे?

BSE

या आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारात (Sensex Today) प्रचंड तेजी पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लेख लिहीत असताना, बीएसई सेन्सेक्स 1928 अंकांनी वधारून 81,383 वर व्यवहार करत होता. एनएसई निफ्टीदेखील जवळपास 600 अंकांनी वाढून 24,597 वर ट्रेड करत होता. चला तर मग, या तेजीचं कारण समजून घेऊया.

आज बाजारात एवढी उसळी का आली?

बिझनेस डेस्क, नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून बाजारात चढ-उतार सुरु होते, पण आज १२ मे रोजी, सोमवारच्या दिवशी शेअर बाजाराने उसळी घेतली. याआधी भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेले तणावाचे वातावरण बाजारावर नकारात्मक परिणाम करत होतं.

मात्र आता परिस्थितीत सुधारणा झाल्याने बाजारात स्थिरता दिसत आहे. घसरण जवळपास थांबली असून, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता कमी होताना दिसतोय. या शांततेचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे.

आताच्या घडीला शेअर बाजारात काय स्थिती आहे?

सध्या बीएसई सेन्सेक्स जवळपास 2000 अंकांनी उसळून 81,425 वर पोहोचला आहे. त्याचवेळी एनएसई निफ्टीत देखील जबरदस्त तेजी आहे. निफ्टी सुमारे 600 अंकांनी वाढून 24,617 वर व्यवहार करत आहे.

या तेजीमध्ये सर्वाधिक भर मेटल आणि रिअल्टी क्षेत्रात दिसून येत आहे. रिअल्टी सेक्टरमध्ये 4% पेक्षा जास्त आणि मेटल क्षेत्रात 3% पेक्षा अधिक वाढ झाली आहे. मात्र, फार्मा स्टॉक्स मात्र घसरणीसह रेड झोनमध्ये ट्रेड करत आहेत.

बाजारात ही तेजी कशामुळे आली?

गेल्या काही दिवसांत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाने युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. मात्र अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशांनी सीजफायरची घोषणा केली. यामुळे आता कोणताही हल्ला होणार नाही, असा स्पष्ट संदेश मिळाला आहे.

जरी पाकिस्तानकडून काही हलकी कुरबुर सुरूच होती, तरी सध्यातरी परिस्थिती शांत आहे. या सकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा बाजारात उत्साहाने सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे.

तसंच अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार करार (Trade Deal) झाल्यामुळेही बाजारात सकारात्मक परिणाम दिसतोय. मागील महिन्यात अमेरिकेने सुमारे 60 देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, मात्र ट्रम्प प्रशासनाने चीनशिवाय इतर सर्व देशांवरील टॅरिफ 90 दिवसांसाठी स्थगित केले.

यानंतर अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ युद्ध सुरु झालं होतं, ज्याचा मोठा परिणाम बाजारावर झाला. पण आता या दोन्ही देशांनी व्यापार करार करून स्थिती सुधारण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे जागतिक बाजारांवरही सकारात्मक परिणाम झाला आहे.