काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसांत अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. या हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटनावर परिणाम झाला असून अनेक पर्यटकांनी त्यांच्या सहली रद्द केल्या आहेत. अशा परिस्थितीत अतुल कुलकर्णी यांनी ‘चला काश्मीरला’ असा नारा देत, दहशतवाद्यांना थेट आव्हान दिलं आहे.
‘तुम्ही धमक्या देऊ नका, काश्मीर आमचं आहे’ – अतुल कुलकर्णी
अतुल कुलकर्णी म्हणाले, “परवाच मी पुण्याहून मुंबईकडे येत असताना विचार केला, या हल्ल्यामागे नेमका हेतू काय असावा? पर्यटकांवर थेट हल्ला करणे म्हणजे इथं लोकांनी येऊ नये, असा संदेश देणं. पण आम्ही का घाबरावं? काश्मीर आपलंच आहे, देश आपलाच आहे. तुम्ही आम्हाला धमक्या देऊन रोखू शकत नाही. आम्ही नक्कीच येणार आहोत, आणि मोठ्या प्रमाणावर येणार आहोत.”
‘गत दोन-तीन वर्षांत पर्यटनात विक्रमी वाढ’ – अतुल कुलकर्णी
यापुढे बोलताना त्यांनी सांगितलं, “गेल्या दोन ते तीन वर्षांत येथे विक्रमी संख्येने पर्यटक आले आहेत. मी इथे आल्यापासून अनेक स्थानिक लोकांशी संवाद साधला आहे. जर ही समस्या दूर करायची असेल, तर एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. पैशांपेक्षा माणसांचं उपस्थित राहणं जास्त महत्त्वाचं आहे. काश्मीरमध्ये ही चळवळ सुरू झाली होती आणि म्हणूनच मला वाटलं की आपणही आपला पाठिंबा देऊन हा संदेश पोहोचवायला हवा. स्वतः इथे या, अनुभव घ्या. काश्मिरी लोक फार दुःखी आहेत. आपण इथे आलो तर त्यांना दिलासा मिळेल.