Home » “ऑपरेशन सिंदूर”: पाकला दिला जोरदार प्रत्युत्तर – पंतप्रधान मोदींचा राष्ट्राला संदेश

“ऑपरेशन सिंदूर”: पाकला दिला जोरदार प्रत्युत्तर – पंतप्रधान मोदींचा राष्ट्राला संदेश

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राष्ट्राला संबोधित करत भारताच्या शौर्याची उजळणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा आपल्या सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने त्यांच्यावर संरक्षणात्मक कारवाई करत भारतावर प्रतिहल्ला केला. मात्र भारताने थेट पाकिस्तानच्या छाताडावर वार केला.

सैन्याला दिली मोकळीक – दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचे आदेश

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या शूर जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे अत्यंत धाडस दाखवत उद्दिष्ट साध्य केलं. त्यांचं हे शौर्य मी देशातील प्रत्येक आई, बहिण आणि मुलीला समर्पित करतो.”

दहशतवाद्यांच्या क्रौर्याने संपूर्ण देश हादरला

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले, “धर्म विचारून लोकांना त्यांच्या कुटुंबासमोर ठार करण्यात आलं – अशा अमानुषतेचं उत्तर द्यावंच लागणार होतं.”

पाकच्या हल्ल्याला दिलं जबरदस्त उत्तर

मोदी म्हणाले, “दहशतवाद्यांवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानने त्यांची पाठराखण करत भारतावर प्रहार केला, पण आपण त्यांच्या छाताडावर जोरदार प्रत्युत्तर दिलं.”

जगाने पाहिलं पाकिस्तानचं दुटप्पीपण

पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना मानवंदना दिली, हेच सिद्ध करतं की तिथे दहशतवाद राज्य पुरस्कृत आहे. भवालपूर व मुरीदकेसारख्या ठिकाणी दहशतीचं शिक्षण दिलं जातं – 9/11 पासून भारतातील मोठ्या हल्ल्यांपर्यंत याच ठिकाणांचा संबंध होता.

पाकिस्तानशी चर्चा फक्त पीओके आणि दहशतवादावरच

मोदींनी स्पष्ट केलं की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा होईल, पण ती केवळ पीओके आणि दहशतवादासंदर्भातच होईल. व्यापार आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत, जसं रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.”

पाकच्या गर्विष्ठ एअरबेसवर भारताचा जोरदार प्रहार

पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानच्या अभिमानाच्या एअरबेसवर भारताने जबरदस्त हल्ले केले. पहिल्याच तीन दिवसांत भारताने पाकिस्तानला इतकं नुकसान केलं की त्यांना अंदाजही नव्हता. नंतर पाकिस्तानने संपर्क साधून शांतता मागितली.

भारत आता अणु धमक्यांना घाबरणार नाही – मोदींचा इशारा

पाकिस्तानकडून अणु हल्ल्यांची धमकी दिली जात असतानाच मोदींनी ठामपणे सांगितलं की, “भारत कोणतीही अणु धमकी सहन करणार नाही. आवश्यक तेव्हा निर्णायक कारवाई केली जाईल. दहशतवादाला पोसणारी सरकारं आणि त्यांचे आक्यांना आपण वेगळं पाहणार नाही.”