मुंबई | प्रतिनिधी – पाकिस्तानमधील दहशतवादी गटांविरोधात भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्की आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला. यानंतर भारतीय पर्यटक आणि टूर ऑपरेटरांनी या दोन देशांतील बुकिंग मोठ्या प्रमाणावर रद्द केली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आता पर्यटकांचा कल दक्षिण आणि ईशान्य भारताकडे वळलेला दिसतो आहे.
परंतु महागड्या विमानसेवा व हॉटेल्समुळे अनेक पर्यटकांना आर्थिक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी व्यक्त केली नाराजी
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, भारतीयांनी गेल्या वर्षी तुर्की व अझरबैजानमध्ये ४००० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला होता. त्यातून त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. तरीही त्या देशांनी अलीकडील आतंकवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बाजूने उभे राहून भारतीय जनतेचा अपमान केला आहे.
त्यांनी असेही सुचवले की, भारत व इतर देशांमध्ये देखील अप्रतिम पर्यटनस्थळांची कमतरता नाही. त्यामुळे भारतीयांनी या देशांकडे वळण्याचे टाळले पाहिजे. देशातील अनेक नामांकित टूर कंपन्या गोयंका यांच्या मताशी सहमत असल्याचे चित्र आहे.
पर्यटक स्वतःहून बुकिंग रद्द करत आहेत – किरण भोईर
मुंबईतील केएमसी हॉलिडेज अँड ऑफशोर प्रा. लि. चे संस्थापक व संचालक किरण भोईर म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर नंतर अनेक पर्यटक स्वतःहून तुर्की व अझरबैजानची बुकिंग रद्द करण्यासाठी पुढे येत आहेत.
भोईर यांच्या मते, हे देश मध्यमवर्गीय भारतीय पर्यटकांसाठी परवडणारे असल्यामुळे अलिकडच्या काळात या ठिकाणी जाण्याचा कल वाढला होता. परंतु आता परिस्थिती बदलली आहे.
तुर्कीमध्ये भारतविरोधी भावना स्पष्ट – आत्माराम परब
ईशा टूर्सचे संस्थापक आत्माराम परब यांनीही आपला अनुभव शेअर करत सांगितले की, काही वर्षांपूर्वी तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपात भारताने मोठ्या प्रमाणात मदत केली होती. तरीही तिथल्या लोकांमध्ये भारतविरोधी भावना खोलवर रुजलेली आहे. ते पाकिस्तानला आपला “बंधू” मानून भारताविषयी द्वेष पसरवतात.
परब हे गेल्या १५ वर्षांपासून ईशान्य भारतातील पर्यटन घडवून आणत आहेत. ते म्हणाले की, ईशान्य भारताकडे पर्यटकांचा कल वाढतो आहे, पण तिथल्या उड्डाणांचे आणि हॉटेल्सचे दर मध्यमवर्गासाठी अडचण निर्माण करतात.
बुकिंग रद्द होण्याचे प्रमाण २५०% पर्यंत वाढले – मेक माय ट्रिप
मेक माय ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या आठवड्यात तुर्की आणि अझरबैजानच्या बुकिंगमध्ये ६०% घट झाली असून पूर्वी झालेल्या बुकिंग रद्द करण्याचे प्रमाण तब्बल २५०% पर्यंत पोहोचले आहे. ईज माय ट्रिपचे सह-संस्थापक प्रशांत पित्ती यांनीही पर्यटकांना ग्रीस, आर्मेनिया यांसारख्या देशांकडे वळण्याचे आवाहन केले आहे.
तुर्की हे आता आतंक समर्थक राष्ट्र – संजय निरुपम
शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी तुर्कीला आतंक समर्थक राष्ट्र म्हणून हिणवले आहे. भारताच्या ९ विमानतळांवर सेवा देणाऱ्या तुर्कीच्या सेलेबी एनएएस या कंपनीचा करार भारत सरकारने रद्द केला असून, या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.
निरुपम म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पर्यटनाच्या माध्यमातून भारत-तुर्की संबंध सुधारत होते, पण अलीकडील घटनांनी हे स्पष्ट झाले आहे की तुर्की एका इस्लामिक राष्ट्रासारखे वागत आहे आणि आतंकवाद्यांना समर्थन देत आहे.
आता व्यापारही थांबवायला हवा – निरुपम यांची मागणी
निरुपम यांनी सांगितले की, भारत दरवर्षी तुर्कीमधून ६०,००० कोटींचा आयात व २०,००० कोटींचा निर्यात व्यवहार करतो. त्यांनी आता हा व्यापार पूर्णपणे बंद करण्याची गरज व्यक्त केली आहे
तुर्की व अझरबैजानने पाकिस्तानच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेमुळे भारतीय पर्यटक यापुढे हे देश टाळण्याचे धोरण अवलंबत आहेत. त्याऐवजी देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळत आहे.