२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताने दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांच्यात गंभीर चर्चा झाली.
या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, थलसेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, आणि नौसेना प्रमुख एडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे सहभागी होते.
पंतप्रधानांनी या बैठकीत स्पष्ट सांगितले की, सरकारला भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हल्ल्याचे वेळापत्रक व पद्धत ठरवण्याची मुभा सैन्यदलांना देण्यात आली आहे. त्यांनी म्हटले, “दहशतवादाला धडा शिकवणे हे आपल्या देशाचे राष्ट्रीय कर्तव्य असून, भारतीय लष्कराला यासाठी सर्वतोपरी स्वातंत्र्य देण्यात आले आहे.”
ही पहिलीच वेळ आहे की सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट पंतप्रधान निवासस्थानी जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराच्या व्यावसायिक क्षमतांवर आणि निर्णयक्षमतेवर विश्वास व्यक्त करत, “ते कुठे, कधी आणि कसे प्रत्युत्तर द्यायचे हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार सैन्यदलांनाच आहे,” असे स्पष्ट केले.