जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ठोस प्रत्युत्तर दिले आहे. ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत हवाई हल्ला केला. यामध्ये ९ दहशतवादी ठिकाणांचा नायनाट करण्यात आला असून, सुमारे २६ दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती मिळत आहे.
या कारवाईबाबत अनेक क्रिकेटपटूंनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, भारतीय सैन्याशी प्रत्यक्ष किंवा मानद पद्धतीने जोडले गेलेले ५ नामवंत भारतीय क्रिकेटपटू कोण आहेत.
—
१. महेंद्र सिंग धोनी
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांना भारतीय लष्करातील टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी मिळाली आहे. २०११ मध्ये भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली वनडे विश्वचषक जिंकला होता. त्याच वर्षी त्यांना १०६ पॅराशूट रेजिमेंटमध्ये सामील करण्यात आले होते. धोनी यांनी पॅराशूट ट्रेनिंगही पूर्ण केली असून, अनेक वेळा सैनिकी गणवेशात त्यांना पाहिले गेले आहे.
—
२. सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर यांना २०१० साली भारतीय वायुदलामध्ये ग्रुप कॅप्टन पदाची मानद पदवी देण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिले – “एकतेमध्ये धैर्य आहे, शक्तीत अमर्याद सामर्थ्य आहे. भारताची खरी ढाल म्हणजे इथली जनता आहे. या जगात दहशतवादाला थारा नाही. आपण एक संघ आहोत. जय हिंद!”
—
३. कपिल देव
१९८३ मध्ये भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता, आणि तो पराक्रम कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. २००८ साली त्यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून मानद पद देण्यात आले. त्यांच्या खात्यावर १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने आहेत.
—
४. सी. के. नायडू
भारताच्या पहिल्या कसोटी संघाचे कर्णधार सी. के. नायडू यांना १९२३ साली होळकर राज्याच्या सैन्यात कर्नल पद देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना ‘कर्नल सी. के. नायडू’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी १९३२ साली इंग्लंडविरुद्ध भारताची कसोटी संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती.
—
५. हेमू अधिकारी
हेमू अधिकारी हे भारतीय क्रिकेटमधील प्रसिद्ध खेळाडू असून ते लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी २१ कसोटी सामने खेळले असून, ३६ डावांमध्ये एकूण ८७२ धावा केल्या.